गणेश भक्त कोकणवासीय प्रवासी संघाचा कौटुंबिक स्नेहसंमेलन सोहळा २०२४ माटुंगा येथे संपन्न
यावर्षी गौरी गणपती उत्सवासाठी प्रवासी संघाच्या माध्यमातून १२०० जादा ग्रुप बुकिंग गाड्यांचे आरक्षण
(दिशा महाराष्ट्राची/ मुंबई- दिपक कारकर)
गणेश भक्त कोकणवासिय प्रवासी संघांचे स्नेह संमेलन रविवार दि.१८ ऑगस्ट २०२४ रोजी यशवंतराव नाट्यगृह माटुंगा येथे कौटुंबिक स्नेहसंमेलन सोहळा- २०२४ मान्यवर, प्रवासी संघ परिवार हितचिंतक यांच्या उपस्थित संपन्न झाला. स्नेहसंमेलनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार तुकाराम काते तसेच समाजसेवक आणि संस्थेचे हितचिंतक श्रीधर (काका) कदम हे या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
स्नेहसंमेलन सोहळा मान्यवर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व गणेश प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमास सुरूवात झाली. संस्थेची प्रस्तावना करताना कार्याध्यक्ष दीपक चव्हाण यांनी संस्थेच्या उपक्रमाबाबत माहिती दिली. त्याच बरोबर यावर्षी गौरी- गणपती उत्सवासाठी प्रवासी संघाच्या माध्यमातून १२०० जादा ग्रुप बुकिंग गाड्यांचे आरक्षण करण्यात आल्याचे सांगितले.
प्रतिवर्षी विद्यार्थी सत्कार आणि शिष्यवृत्ती देऊन मुलांचा सत्कार करण्यात येतो. या वर्षी इयत्ता दहावी मधून कु. मुग्धा राजेंद्र सुरवे, इयत्ता बारावी- साक्षी राजेंद्र दणदने, पदवीधर मधून – कु.ईशा अनिल आगरे आणि कु.चिंतन नथुराम म्हादे (न्यूट्रिशन डॉक्टरेट पदवीधर) सर्व विद्यार्थी यांना सन्मानित करण्यात आले. त्याचप्रमाणे उत्कृष्ट कार्यकर्ता सन्मान अर्नाळा विभागाचे गणेश फिलसे यांना देण्यात आले. स्नेहसंमेलन सोहळा निमित्त अफलातून कॉमेडी आणि संजय खापरे यांचे अभिनीत असणारे ” सैरभैर ” ह्या नाट्य प्रयोगाने रसिकांचे मनोरंजन केले.
गणेशभक्त कोकणवासीय प्रवासी संघ, ही संस्था गेली ३८ वर्षे प्रवाशांच्या सेवेसाठी कार्यरत आहे. प्रवासी संघाच्या माध्यमातून एस. टी. महामंडळाच्या सहकार्याने गौरी- गणपती सणात एस. टी. १२०० पेक्षा जास्त गाड्यांचे नियोजन होते. कार्तिकी पंढरपूर यात्रेकरीता १०० पेक्षा जास्त गाड्यांचे नियोजन होते. होळी सण, उन्हाळी हंगाम आणि प्रवाशांच्या गरजेनुसार एस. टी. गाड्यांचे नियोजन केले जाते. प्रवासा सोबत ग्रामीण भागात शैक्षणिक, आदिवासी पाड्यात वैद्यकीय उपक्रम सातत्याने राबविण्यात येतात.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे संघटक अनिल काडगे, कोषाध्यक्ष विश्वनाथ मांजरेकर त्याचप्रमाणे विभाग वर पदाधिकारी मुंबई विभाग- श्रीधर आग्रे,अशोक नाचरे / परळ विभाग- रमेश तेजम, मधुकर जोईल, रघुनाथ माधव / कुर्ला विभाग- भास्कर चव्हाण, रमेश बने, रणजीत वरवटकर/ बोरिवली विभाग- किशोर सावंत, लक्ष्मण मंचेकर, भागोजी सोलकर/ नालासोपारा विभाग- अजित दौंडे/ संजय जावळे अर्नाळा विभाग- गणेश फिलसे हजर होते.
सोहळयाची सांगता संस्थेचे अध्यक्ष रविंद्र मुकनाक यांनी उपस्थित मान्यवर, हितचिंतक, प्रवासी संघ परिवार यांचे आभार मानून अध्यक्षांच्या भाषणाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे सचिव चंद्रकांत बुदर यांनी केले.