माणगाव येथील भीषण अपघाताचे कोकणात तीव्र संताप! हेदवीत शोकाकुल वातावरणात झाले मृतांवर अंत्यसंस्कार
(दिशा महाराष्ट्राची / गुहागर- उदय दणदणे)
गेली १२ वर्ष पेक्षा अधिक काळ रखडलेला मुबंई गोवा महामार्ग मृत्यूचे कारण ठरत असून अनेक कुटुंब मुंबई- गोवा महामार्गावर अपघात होऊन उध्वस्त झाल्याच्या अनेक घटना आजवर घडल्या आहेत.
नुकतेच दिनांक १९ जानेवारी २०२३ रोजी पहाटे पाचच्या सुमारास मुंबई हुन गुहागरकडे जाणाऱ्या इको कार आणि मुंबई दिशेने जाणाऱ्या ट्रकच्या समोरासमोर झालेल्या धडकेत भीषण अपघात होऊन इको कारचा अक्षरशः चक्काचूर होऊन कार मधील एकूण- १० व्यक्तींचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मुंबई- गोवा हायवेवर घडली. सदर अपघातात माणगाव तालुक्यातील रेपोली येथे झाला असून सदर अपघाताचे कोकणात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
अपघातात मृत्यू पावलेल्या व्यक्ती-: अमोल रामचंद्र जाधव (वय ४०) हेदवी, दिनेश रघुनाथ जाधव (वय ३६) हेदवी, कांचन काशिनाथ शिर्के (वय ५०), नंदिनी निलेश पंडित (वय ३५) डावखोत, निलेश पंडित (वय ४२) डावखोत, अनिता संतोष सावंत (वय ५५) सावंतवाडी, मुद्रा निलेश पंडित (वय १२) डावखोत, दिपक लाड (वय ५८) डावखोत, निशांत शशिकांत जाधव (वय २३), भव्य निलेश पंडित (वय 3वर्ष 6 महीने)
सदर अपघात अत्यंत दुर्दैवी, गंभीर, भयानक, अंगावर शहारे आणि मन सुन्न करणारा होता. हेदवी आणि हेदवी पंचक्रोशीतील स्त्रिया व पुरुष ग्रामस्थ मोठ्या संख्येने अंत्यदर्शनासाठी उपस्थित होते. सर्वांचेच मन हेलावलेले होते. हेदवी गावात तसेच पंचक्रोशीतील गावांत भयानकता शांतता पसरली होती. वातावरण फारच गंभीर व शोकाकुल होते. दुखाःश्रूने सर्वजण मृतांच्या पवित्र आत्मांस श्रद्धांजली वाहत होते. सदर मृत्युमुखी पडलेल्या ७ व्यक्तींवर हेदवी येथील स्मशानभूमीत, २ व्यक्तींवर मुंबई येथील स्मशानभूमीत तर १ व्यक्तीचे सावंतवाडी येथील स्मशानभूमीत रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले.
हेदवी येथील जाधव कुटुंब आणि त्यांचे नातेवाईक अतिशय भीषण अशा अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींचे रात्री ९ ते १० च्या दरम्यान वेळणेश्वर जिल्हा परिषद गटाच्या माजी सदस्या- नेत्राताई ठाकूर तसेच त्यांच्या सोबत आलेले उमराठचे सरपंच- जनार्दन आंबेकर, हेदवीच्या सरपंच -आर्या मोरे, वेळणेश्वरचे सरपंच चैतन्य धोपावकर, वाडदईचे तंटामुक्ती अध्यक्ष- विनायक कांबळे, उमराठचे तंटामुक्ती अध्यक्ष- संदीप गोरिवले यांनी अंत्यदर्शन घेऊन मृतांच्या पवित्र आत्म्यास श्रद्धांजली वाहिली आणि सुनिल जाधव कुटूंबिंयांचे सांत्वन करून अचानक ओढवलेल्या दुःखातून बाहेर येण्यासाठी जाधव कुटूंबिंयाना धीर दिला. सोबत उमराठच्या ग्रामपंचायतीचे सहाय्यक नितीन गावणंग, रोजगार सेवक प्रशांत कदम, ग्रामस्थ महेश गोरिवले, अजीत गावणंग, श्रीकांत कदम इत्यादी मंडळी उपस्थित होते.